ठाणे : महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाली असताना सरकारच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमात आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असताना सुद्धा या कार्यक्रमात सर्रास पणे प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचं समोर आल आहे. त्यामुळे सरकार प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणाविषयी किती गंभीर आहे हे समजते.
महाराष्ट्र सरकारने राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवडीच लक्ष ठेवलं आहे. त्या कार्यक्रमाचा शुभारंभ कल्याणमधील वरप गावात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. परंतु सरकारच्या पर्यावरण खात्याने अंमलात आणलेली प्लास्टिक बंदी या कार्यक्रमात पायदळी तुडवल्याचे समोर आलं आहे. कारण या कार्यक्रमात पाणी वाटप करण्यासाठी बंदी असलेले प्लास्टिकचे ग्लास बिनधास्त वापरले गेले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री, राज्यमंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. परंतु एकाला सुद्धा राज्यातील प्लास्टिक बंदीची आठवण झाली नाही असं चित्र होत. त्यामुळे सामान्यांवर ८ हजार ते २५ रुपयाचा दंड आकारण्याचा नियम बनविणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम आता उपस्थित नेते मंडळींकडून दंड वसूल करणार का असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
