परभणी : मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच निर्णय घोषित करते वेळी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या या निर्णयाची आता खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.
सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते परभणी येथे आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमत्र्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे प्रतिक्रिया देताना म्हणाले की,’आता विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल’, असे म्हणून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना चिंमटा काढला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना मनसे अध्यक्ष म्हणाले की, राज्यात थापा मारणारे मुख्यमंत्री असून इतकं खोटे बोलणारे सरकार कधी बघितलेच नव्हते. केंद्र व राज्यात या दोन्ही ठिकाणी आजपर्यंतचे सर्वात खोटे सरकार असल्याची टीका सुद्धा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
