मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला ९ दिवसांपूर्वी बाळ झाले होते. भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात म्हणजे राणीच्या बागेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तसेच मुंबईकरांसाठी सुद्धा आनंदाचं बातमी आली होती.
तब्बल ४० दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बेबी पेंग्वीन जन्माला आले होते. त्यामुळे हे छोटं बेबी पेंग्विन सुद्धा त्याच्या आई-बाबांसह उद्यानातील पाण्यात सूर मारताना मुंबईकरांना पाहता येणार होते. स्वतः युवसेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून व्हिडिओ शेअर केला होता. परंतु आता आलेल्या बातमीनुसार काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या त्या पेंग्विनच्या यकृतात बिघाड झाल्याने त्या पेंग्विन’च्या बाळाचा दुर्दैवी मृत्य झालं आहे असे वृत्त आहे.
मुंबईकरांसाठी ही दुःखाची बातमी असली तरी यापुढे मुंबईत पालिका प्रशासनाने इतर पेंग्विनच्या बाबतीत योग्य ती काळजी घेणे गरजेचे असून भविष्यात अधिक सतर्क राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
