नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफ’च्या जवानांवरील भ्याड दहशदवादी हल्ला आणि त्यानंतर एअर स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा ३ मार्चपासून सुरळीत सुरु झाली आहे. दोन्ही देशांनी मिळून रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील रविवारी दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस पुन्हा निघाली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही तशी अधिकृत माहिती दिली प्रसिद्ध केली होती.
पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय झाला आहे. त्यानुसार तीन मार्चला भारतातून पाकिस्तानसाठी पहिली ट्रेन निघेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. भारताने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस बंद केली होती.
भारतातून मागील रविवारी समझोता एक्सप्रेस पाकिस्तानला गेली. त्यानंतर सोमवारी लाहोरहून तीच ट्रेन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाली. भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच प्रयत्न सुरु आहेत. समझोता एक्सप्रेसची सेवा पूर्ववत होणे याला तणाव कमी करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हटले गेले.
