नवी दिल्ली: पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हवालदिल झालेल्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पीएमसी बँकेवर निर्बंध आणण्यात आले असून पैसे काढण्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. यामुळे अनेक खातेधारक चिंताग्रस्त असून धक्क्याने दोन खातेदारांचा मृत्यूदेखील झाला आहे. काही खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करत पैसे काढण्यावर मर्यादा आणणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने आधीच चिंताग्रस्त असणाऱ्या खातेदारांच्या चिंतेत भर टाकली असून दिलासा देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्यात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेच्या नोंदीत १०.५ कोटींची नोंद नसल्याचं तपास पथकानं म्हटलं आहे. एचडीआयएल आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी दिलेले धनादेश पथकाच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे हे धनादेश कधीच बँकेत जमा न करता रोख रक्कम देण्यात आली. त्याशिवाय हा घोटाळा ४ हजार ३५५ कोटी रुपयांचा नसून तब्बल ६ हजार ५०० कोटींचा असल्याचंही समोर आलं आहे.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याची तपासणी करणाऱ्या पथकाला मिळालेल्या धनादेशांची एकूण किंमत १० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच अंदाजे ५० लाख रुपयांचा हिशोब नाही. याशिवाय बँकेतील घोटाळ्याची रक्कम २ हजार कोटींनी वाढली आहे. आता ती ६ हजार ५०० कोटी रुपये इतकी झाली आहे.

पीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; याचिकेवरील सुनावणीस नकार