नवी दिल्ली: राज्यातला सरकारस्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेना, भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना मिळून बहुमत असूनही सरकारस्थापनेचा दावा भारतीय जनता पक्षाने केलेल नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोहोंमध्ये एकमत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर तिकडे दिल्लीत आणखी वेगळ्या घडामोडी घडत आहेत. आज सकाळी अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात. त्यामुळेच या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील सत्ता स्थापनेवर चर्चा झाली होती. राज्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीला बहुमत मिळालं असतानाही या दोन्ही पक्षात मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे निकाल लागून १४ दिवस उलटले तरी राज्यात सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल झाली नाही.

दरम्यान, आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना ठाम असल्याचं सांगितलं आणि आधी ठरलेला गोष्टींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार असं देखील स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. यासंदर्भात विचारले असते राऊत म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याला शिवसेना जबाबदार असणार नाही. जर राज्यावर कोणी राष्ट्रपती राजवट थोपवण्याचा प्रयत्न कर असेल तो महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान असेल. असे काही झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर झालेला अन्याय असेल आणि तो अधर्माचा विजय ठरेल, असे राऊत म्हणाले.राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला आहे का यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यासंदर्भात आम्ही बघून घेऊ काय करायचे.

शेतकरी, रस्त्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती, अशी माहिती अहमद पटेल यांनी भेटीनंतर दिली. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, महाराष्ट्राचा म सुद्धा काढला नाही, असा दावाही त्यांनी केला.

दिल्लीत सोनिया गांधींचे विश्वासू काँग्रेस नेते अहमद पटेल गडकरींना भेटले