उत्तर प्रदेश: मिड-डे मील घोटाळा प्रकरणात भारतीय जनता पक्ष शासित उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. अनेक वेळा मिड-डे जेवणामध्ये मुलांना केवळ मीठ आणि ब्रेड दिले जातात. तर अनेकदा एक लिटर दुधात बादलीभर पाणी मिसळून तब्बल ८१ मुलांना पिण्यास दिले जाते. मात्र आता जेवणाची गुणवत्ता विकोपाला गेल्याचं चित्र आहे, कारण मिड-डे जेवणात मृत उंदीर सापडल्याचं वृत्त आहे.

सदर प्रकरण पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील आहे. येथे जनता इंटर कॉलेज मुस्तफाबाद पचेंडा येथे मिड-डे जेवणात मुलांच्या जेवणात मेलेला उंदीर सापडला. तेच जेवण मुलींनी खाल्ल्याने ९ मुलांची प्रकृती खालावली आहे. त्यानंतर मुलांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने या जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट अनेक एनजीओ’ना दिले आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. दरम्यान हे मिड-डे जेवण एका सार्वजनिक कल्याण सेवा समितीने (स्वयंसेवी संस्था) विद्यालयाला दिले आहे. मंगळवारी सकाळी एका शिक्षकासह ९ मुलांना एनजीओ कामगारांनी खाण्यासाठी दुपारचे भोजन दिले. यावेळी दुसऱ्या रांगेत बसलेल्या मुलाच्या भांड्यात एक मृत उंदीर दिसला आणि त्यानंतर सर्व मुलांकडून जेवण काढून घेण्यात आले.

पण तोपर्यंत उशीर झाला होता कारण शिक्षकासह ९ मुलांनी मिड-डे जेवण खाल्ले होते. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार २-३ मुलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या एकूण १० जणांवर स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बीएसए’ने मध्यरात्री जेवणाचे जिल्हा समन्वयक विकास त्यागी यांना तपासासाठी घटनास्थळी पाठविले. तसेच पुरवठा करणार्‍या स्वयंसेवी संस्थांविरूद्ध कारवाई करण्यासाठी मिड-डे जेवण विकास प्राधिकरणाला पत्र पाठविले. यापूर्वी सोनभद्र जिल्ह्यातल्या मिड-डे मीलमध्ये घोटाळ्याची घटना घडली होती.

युपी: लहान मुलांच्या मिड-डे जेवणात मृत उंदीर; ९ मुलांची प्रकृती खालावली