नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान देण्यात आले आहे. साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रत्येकवेळी भारतीय जनता पक्षाकडून स्पष्टीकरण दिले जाते. तसेच वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना इशारा दिला जातो. त्यानंतरही त्यांचे वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच आहे. साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गोडसेला देशभक्त म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तत्पूर्वी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भयानक दहशदवादी हल्ल्यात अनेक निर्दोष नागरिकांसह वरिष्ठ तसेच कनिष्ठ पोलीस देखील शहीद झाले होते. दरम्यान, त्या हल्ल्यात अजमल कसाब या दहशदवाद्याला जिवंत पकडताना हवालदार तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हेमंत करकरे तसेच विजय साळसकर यांच्यासह अनेक धाडसी अधिकारी मुंबई पोलिसांनी गमावले होते.

परंतु त्याच शहीद अधिकाऱ्यांच्या मृत्यूवरून मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील विद्यमान खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी धक्कादायक विधान केलं होतं. हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं असं संतापजनक वक्तव्य भोपाळ येथे उपस्थितांना संबोधित करताना केलं होतं. विशेष म्हणजे अनेक भारतीय जनता पक्ष समर्थकांनी या संबंधित बातम्या व्हिडिओ सकट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ‘लव’ इमोजीद्वारे व्यक्त होत, स्वतःच्या भावना कोणत्या थराला जाऊन पोहोचल्या आहेत याचा पुरावा दिला होता.

शहिदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत सदस्यपदी