नवी दिल्ली: अवघ्या १० दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. त्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, मंगळवारी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली.

त्यानंतर पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं केलं आहे. “दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात बहुतांश लोक पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहे,” भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्षाला घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंड मधील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. त्यासाठी देशभरातील तब्बल २००, खासदार, ७० केंद्रीय मंत्री आणि ११ विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी दाखल होणार आहेत. यावर हे सर्वजण आप’ पक्षाला हरवण्यासाठी मुक्काम ठोकणार असल्याचा जोरदार प्रचार आपच्या वतीने सध्या सुरू झाला आहे. समाज माध्यमांसह विविध ठिकाणी आप’द्वारे भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

Web Title:  Delhi Assembly Election Polls 2020 BJP bringing 200 PMs to defeat CM Arvind Kejriwal.

भाजपला दिल्लीत धुव्वा उडण्याची भीती? २०० खासदार, ७० केंद्रीय मंत्री, ११ मुख्यमंत्री प्रचारात