नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिल्ली विकास प्राधिकरणद्वारा आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना आणि नेत्यांना संस्कृतीचे पालन करण्यास भाग पाडले आहे. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल काही तरी नवीन करत असतात. विचार का करायचा, बजेट का द्यायचे, त्यापेक्षा दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे क्रेडीट घ्यायचे धोरण केजरीवाल यांचे असल्याची टीका शाह यांनी केली. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन ६० महिने झाले आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण का नाही केले. यापुढेही ते पूर्ण होणार नाहीत. केवळ जाहिरातबाजी करून केजरीवाल जनतेला फसवत आहेत. त्यांनी जीवनात केवळ विरोध करणे आणि आंदोलनच केली आहेत, असंही शाह म्हणाले.

तत्पूर्वी २०१८ मध्ये दिल्ली’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विकास कामांच्या मुद्यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट रामलीला मैदानावर खुल्या चर्चेचे आवाहन दिल होतं. देशातील पूर्वांचलच्या भागात विकासासाठी मोदी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये अमित शहांनी मांडला होता त्याला केजरीवाल यांनी खुलं आवाहन देत, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ दे असं म्हटलं होतं.

दरम्यान, वित्त आयोगाच्या अंतर्गत मिळणाऱ्या निधीवर बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले होते की, काँग्रेस सरकारने १३ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पूर्वांचलच्या विकासासाठी केवळ ४ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तर नरेंद्र मोदी सरकारने मात्र १४ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ही रक्कम जवळपास तिप्पट करुन १३ लाख ८० हजार कोटी रुपयांचा निधी पूर्वांचलसाठी दिला असा दावा शहांनी केला होता. नेमका याच मुद्याचा आधार घेत १४ व्या वित्त आयोगांतर्गत दिल्लीला केवळ ३२५ कोटी रुपयांचा निधी का दिला, असा प्रश्न केजरीवाल यांनी अमित शहां पुढे उपस्थित केला होता.

त्यानंतर ज्या विकासाचा धिंडोरा भाजपला वाजवला आहे, त्याच भाजपच्या विकासाला केजरीवाल यांनी खुलं आवाहन देत आप’ने केलेली विकास कामं आणि भाजपने केलेली विकास कामं यावर रामलीला मैदानावर खुली चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी अमित शहा यांना दिल होतं.

ट्विट’वर भाजपने केजरीवाल यांना उत्तर दिल होतं की,’केजरीवालजी, या ४ वर्षांत तुम्ही दिल्लीकरांसाठी काय काम केले? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एकच मूलमंत्र आहे. खोटे बोलणे आणि वारंवार रेटून खोटे बोलणे,’ असे टिष्ट्वट भाजपने केले होते. तर भाजपला प्रत्युत्तर देताना केजरीवालांनी आरोग्य, शिक्षण, वीज-पाणी या क्षेत्रात आप’च्या सरकारने केलेल्या मूलभूत कामांचा दाखला दिला होता. तसेच आपच्या या कामांची प्रशंसा जागतिक स्तरावरही होत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते.

 

Web Title:  Delhi CM Arvind Kejriwal Taking Credit Central Government Work says Union Home Minister Amit Shah.

केजरीवाल सरकार मोदी सरकारच्या विकास कामांचं क्रेडिट स्वतःकडे घेत आहे: अमित शहा