मुंबई : अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१- २७ जुलै २०१५) यांचा आज चौथा स्मृतिदिन. वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारताचे राष्ट्रपती ह्या सर्व पदांवर कार्य केलेले एक थोर भारतीय म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याच्या सवयीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले.
राष्ट्रपती पदाच्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी भारतीयांच्या मनात मनाचे स्थान निर्माण केले. त्यांनी त्यांच्या जीवन कालावधीत अनेक पुरस्कार मिळवले. १९८१ साली पदमभूषण १९९० साली पद्मविभूषण आणि १९९८ साली भारतातील सर्वोच असा पुरस्कार भारतरत्न हि मिळवला. स्विझर्लंडनेही त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीची दाखल घेतली. व ज्यादिवशी त्यांनी स्विझर्लंडला भेट दिली तो दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. काही काळ त्यांनी पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागाराचे कामही केले. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते.
त्यांना रुद्रवीणा वाजवण्याचा व लहान मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. त्यांनी अग्नीपंख, उन्नयन, सायंटिस्ट टू प्रेसिडेंट अशी अनेक पुस्तके लिहिली. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विध्येची अखंड साधना करीत त्यांनी खडतर आयुष्य काढले. कलाम यांचे निधन २७ जुलै २०१५ मध्ये शिलॉंग मध्ये झाले. राहण्यायोग्य पृथ्वी निर्माण करणे या विषयावर इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट शिलॉंग येथे ते व्याख्यान देत असताना कोसळले. त्यांच्या निधनाने भारतातच नव्हे तर सर्व जगातील विज्ञान प्रेमींवर शोककळा पसरली. कलाम यांनी आपल्या भरीव कामगिरीने उत्तम बुद्धिमत्तेने आणि विनम्र स्वभावाने देशातील आजच्या व भावी पिढीसाठी उत्तम आदर्श ठेवला आहे. त्यांची कमतरता भारताला सदैव जाणवत राहील.
