लंडन: भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी येत्या रविवारी म्हणजे १६ जूनला मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एकमेकांविरोधात खेळणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत हे सख्खे शेजारी राष्ट्र; पण पक्के वैरी सातव्यांदा एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. इतिहास आणि भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ बाजी मारेल हे नक्की आहे. पण, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, स्पर्धेवरच बहिष्कार घालावा अशी मागणी अनेक क्रिकेट चाहते करत होते. लोकसभेच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागवली असंच म्हणावं लागेल. कारण देश, ध्वज आणि सैनिकांप्रती असणारी नैसर्गिक देशभक्ती ही कधीच क्षणिक नसते आणि कोणी आपल्यात जागृत करण्याची गरज नसते.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २ गुण नाही मिळाले तरी चालतील; पण देशभक्ती महत्त्वाची, अशा तीव्र भावना समाज माध्यमांवरील डिजिटल देशभक्तांनी व्यक्त केल्या होत्या. मात्र आता हीच डिजिटल देशभक्त मंडळी भारत- पाकिस्तान सामन्यासाठी एखाद्या सणाप्रमाणे तयारी करत आहेत. या देशात क्रिकेट हा खेळ महत्त्वाचा आहे, हे जगजाहीर आहे. मात्र, या खेळाच्या वेडापुढे देशप्रेमही तकलादू आणि क्षणिक आहे की काय, असा प्रश्न कुणी विचारल्यास काय उत्तर द्यायचं? अर्थात, पुलवामा हल्ल्यानंतर, पाकिस्तानला मैदानावर नमवून जवानांच्या बलिदानाला आदरांजली द्या, असं म्हणणाराही एक वर्ग होता. पण त्यांची संख्या कमी होती. आता सगळेच पक्ष बदलतील हे नक्की.
या पार्श्वभूमीवर, क्रिकेट आणि राजकारण हे वेगवेगळे ठेवलेलेच बरं, हे पक्कं झालंय. अन्यथा असे तकलादू देशभक्त गल्लीगल्लीत तयार होत राहतील. एखादा हल्ला झाला की सोशल मीडियावरून पाकिस्तानला शिव्यांची लाखोली वाहायची आणि नंतर पलटी मारायची हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे तुमच्यातली भक्ती नक्की कोणती आहे? क्षणिक की नैसर्गिक हा प्रश्न स्वतःलाच विचारा.
