हैदराबाद: देशभरात कर्जबाजारीपणामुळे तसेच इतर नैसर्गिक आपतींमुळे देशोधडीला लागलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतं. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याची आकडेवारी अनेकदा वेगवेगळ्या अहवालात समोर आली आहे.

देशातील एकूण उद्योग क्षेत्रात कृषिक्षेत्राचा सर्वात मोठा वाटा आहे, कारण याच कृषी उद्योगात सर्वाधिक रोजगार मिळत असतो. परिणामी शेतकरी आणि शेती उद्योगालाच देशांतर्गत सरकारी धोरणं, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सर्वाधिक आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीतील नुकसान आणि शेतीव्यवसाय कोसळला की त्यावर अवलंबून असणारा कामगार वर्ग देखील पोटापाण्यासाठी वणवण करत असतो.

मात्र आता कृषी क्षेत्रापाठोपाठ माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सेवाक्षेत्रावर देखील रोजगार गमावण्याची वेळ आल्याचे समोर आलं आहे. परिणामी माहिती क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर कपातीची अधिकृत घोषणा देखील केली आहे. त्यामुळे अर्थातच माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांवर देखील भीतीचं सावट आहे हे स्पष्ट झालं आहे. कारण एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनीअर तरुणीने नोकरी जाईल या भीतीपोटी स्वतःचं आयुष्यच संपवलं. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही २४ वर्षांची तरुणी ज्या कंपनीत काम करत होती, तिथे Layoffs अर्थात नोकरकपात होणार असं जाहीर केलं होतं. त्यात आपलं नाव आलं आणि नोकरी गेली तर या चिंतेत ही तरुणी मागील काही दिवसांपासून होती. त्यातून आलेल्या नैराश्यातूनच तिने टोकाचं पाऊल उचललं.

ती राहात असलेल्या लेडिस हॉस्टेलच्या पंख्याला गळफास अडकवून तिने आयुष्य संपवलं. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मेहबूबनगर जिल्ह्यातली होती आणि हैदराबादमध्ये काम करत होती. याच कंपनीत ती मागील अडीच वर्षं ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करायची. तिच्या कंपनीने तिच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांना डिसेंबरमध्ये लेऑफ होऊ शकतात, असं सांगितलं होतं. तसं पत्र तिच्या हाती नुकतंच पडलं होतं. नोकरी जाण्याच्या भीतीने तिने हॉस्टेलच्या रूममध्येच पंख्याला गळफास घेतला. दरम्यान ३० नोव्हेंबर हा तिच्या नोकरीचा शेवटचा दिवस ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे तिने या बेरोजगारीचा धसका घेतला होता. या मुलीबद्दल अन्य माहिती अजून मिळालेली नाही. देशभरात मंदीचे वारे वाहात असल्याचं चित्र आहे. अनेक मोठ्या आयटी कंपन्यांनीही कामगार कपात करण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत.

दुर्दैवी! कंपनीत नोकरकपातीच्या धास्तीने सॉफ्टवेअर इंजीनिअर मुलीची आत्महत्या