मुंबई: महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचा चित्ररथ डावलला तरी भाजपा गप्प का? अशी विचारणा केली आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने बोंबाबोंब केली असती अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राच्या चित्ररथाने पटकावलेला आहे. असे असतानाही महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला. काँग्रेस राजवटीत हा प्रकार घडला असता तर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने बोंबाबोंब केली असती. आज ते गप्प का?, असा प्रश्नही राऊत यांनी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला.

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथांनी नेहमीच छाप पाडली आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र नंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. १९८० मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर १९८३ मध्ये बैळपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल आला होता. पुढे १९९३/९४/९५ अशी सलग ३ वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. २०१५ मध्ये पंढरीची वारी ह्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर २०१८ मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने प्रथम स्थान पटकावले होते.

 

Web Title:  Modi Government Politics Over Tableau Shivsena and NCP Accuses Center of Malice.

मोदी सरकारकडून महाराष्ट्राचा अपमान; प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात चित्ररथ नाकारला