मुजफ्फरपूर : बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने मोठं थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या भयंकर आजाराने आतापर्यंत तब्बल ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूरमध्ये इन्सेफेलाईटीस या आजाराने तब्बल ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने बिहारमध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. एसकेएससीएच या इस्पितळात ५५ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल इस्पितळामध्ये ११ मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात मुलांना ताप येतो. त्यांच्यावर सध्या अनेक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. परंतु, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने २२ मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याची माहिती लोकांनी दिली आहे.

बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, ६६ मुलांचा मृत्यू