नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका संपताच सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला ‘नमो टीव्ही’ हे चॅनल दूरचित्रवाणीवरुन अचानक गायब झालं आहे. ‘नमो टीव्ही’वरून केवळ भारतीय जनता पक्षाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जात होते. या चॅनलला भारतीय जनता पक्षाकडून निधी पुरवठा होत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबताच या चॅनचलं प्रसारण देखील लगेच बंद झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून, केवळ लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा आणि स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी तो सुरु करण्यात आल्याच्या संशयाला जागा आहे.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हणजे २६ मार्च रोजी अचानक सुरू झालेलं हे चॅनल सुरूवातीपासूनच वादात अडकलं होतं. नमो टीव्हीवर केवळ भाजपाशी संबंधित कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणे व सभा दाखवल्या जात होत्या आणि एखाद्या राजकीय व्यक्तीच्या नावाने काढलेलं हे देशातील एकमेव चॅनल होतं.
एप्रिल महिन्यात आयोगाने प्रचार थांबल्यावर म्हणजे मतदानाच्या ४८ तास आधी नमो टीव्हीवर रेकॉर्डेड शो दाखविण्यास मनाई केली. परंतु नमो टीव्हीला निवडणुकीचं थेट प्रक्षेपण दाखविण्यास परवानगी दिली होती. नमो टीव्हीवरील प्रसारणावर आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना लक्ष ठेवण्याचे आदेशही दिले होते. तसेच या चॅनलेचे मॉनिटरींग करण्याचेही आदेश देण्यात आले होते. यापूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी विना परवानगी कोणताही कार्यक्रम नमो टीव्हीवर दाखविण्यास मनाई केली होती. नमो टीव्ही भाजपा चालवत असून त्यामुळे या टीव्हीवरील सर्व रेकॉर्डेड कार्यक्रम विना परवानगी दाखविता येणार नाही, असं आयुक्तांनी म्हटलं होतं. परवानगी शिवाय दाखविण्यात येणारा सर्व कंटेन्ट या चॅनलवरून हटविण्याचे आदेशही देण्यात आले होते.
याशिवाय काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे चॅनल बंद करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर आयोगाने नमो टीव्हीवरुन मंत्रालयाकडे अहवाल मागून एक नोटीस जारी केली होती. मात्र मतदान झाल्यानंतर हे चॅनल लगेचच अचानक गायब झाल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे.
मात्र भाजप आणि मोदींशी संबंधित हे चॅनेल सुद्धा एक चुनावी जुमला ठरला असल्याने सर्वत्र भाजपने रंग दाखवण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे यावर भाजप किंवा नरेंद्र मोदी स्वतः काही उत्तर देतील अशी अपेक्षा देखील नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
