नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकांच्या वेळी १२ सप्टेंबर रोजी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी निवडणुकांच्या तारखा घोषित न झाल्याने सगळ्यांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे लागून राहिल्या होत्या. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. नेमकं या निवडणुकीतील मतदान दिवाळीपूर्वी होतील का दिवाळीनंतर होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच घोषणा करण्याचं आयोगानं टाळलं होतं. त्यासाठी आजचा दिवस निवडला आहे.

२०१४च्या तुलनेनं यंदा तारीख जाहीर होण्यास उशीर झाला आहे. त्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अखेर तो क्षण आला आहे. मतदान दिवाळीच्या आधी होणार की नंतर, निवडणूक नेमकी किती टप्प्यांत होणार याबाबत उत्सुकता आहे. या प्रश्नांची उत्तरंही आज मिळणार आहेत.

महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार