नवी दिल्ली : औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी पुन्हा त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचं उदाहरण समोर ठेवलं आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील खासदार म्हणून मुद्देसूदपणे संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी बोलून दाखवल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कामाची स्तुती केली होती, तसेच त्यांच्यातील अभ्यासू पत्रकार देखील त्यावेळी सभागृहाने अनुभवाला होता.
मध्यंतरी त्यांनी औरंगाबादच्या समस्येवरून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना देखील खुलं पत्रं लिहून, औरंगाबादकरांच्या स्थानिक समस्यांचा पाढाच वाचून दाखवला होता. मात्र आता त्यांनी भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या कामाची देखील मोठ्या मनाने स्तुती देखील केली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. अशातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी गडकरी यांच्या कामाची स्तुती केली आहे.
इम्तियाज जलील यांनी सभागृहात बोलताना, केंद्रीय मंत्री म्हणून देशात सर्वात चांगले काम जर कुणी करत असेल तर ते नितीन गडकरी आहेत. मी विरोधी पक्षाचा खासदार असलो तरी त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे हे गडकरींच्या चांगल्या कामाचे एक उदाहरण आहे. त्याचे श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त गडकरीनांच अशा शब्दात गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करत असतांना मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आणि शेकडो निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यावर वचक कसा बसवणार असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला. दरम्यान खासदार इम्तियाझ जलील यांच्या माणसं जोडण्याच्या या कलेमुळे त्यांना मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यास देखील मदत होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
