नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता मोहिमे’चा नारा दिला असला तरी, स्वतःचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात मात्र वेगळे आणि अत्यंत भयाण चित्र पाहायला मिळते आहे. वाराणसी असंख्य मंदिरे आणि छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांनी भरलेले शहर आहे. मंदिरांच्या अवतीभोवतीचा परिसर आणि अरुंद गल्ल्यांमधील कचरा वाराणसीसारख्या सांस्कृतिक वारसा असलेल्या शहराला गालबोट लावतो. या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात वाराणसीची ७०व्या क्रमांकावर घसरण झालेली असून मागील वर्षी वाराणसी २९व्या क्रमांकावर होते.
मागील वर्षी केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फॉन्सो यांनी वाराणसीला भेट दिली होती. या भेटीनंतर वाराणसी हे गलिच्छ शहर असल्याची टिप्पणी अल्फॉन्सो यांनी केली होती. काशी विश्वनाथाचे मंदिर आणि गंगाकिनारी असलेले ऐंशीहून अधिक घाट हे वाराणसीचे वैशिष्टय़. काशी विश्वनाथ मंदिराच्या भोवतीच्या सर्पाकार चिंचोळ्या गल्ल्यात प्लास्टिकच्या वस्तू, कुल्हड, खाव्याचे पदार्थ, वेगवेगळे खाद्यपदार्थ, भांडय़ांची, सोन्या-चांदीची, कापडांची, साडय़ांची अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. खाली दुकाने त्यावर घरे. इथल्या फारच कमी गल्ल्या स्वच्छ या प्रकारात मोडतात.
मंदिराला वेटोळे घालणाऱ्या गल्ल्यांतून बाहेर आले की, तुलनेत मोठे रस्ते दुकानदारांनी आणि भक्तांनी भरून गेलेले असतात. काकड आरतीपासून मध्यरात्रीपर्यंत भक्तांचा ओघ मंदिराकडे असल्यामुळे फुलमाळा आणि प्रसाद यांचे सांडलेले अवशेष जागोजागी पाहायला मिळतात. दुकानांभोवती दिवसाअखेर कचरा वाढत जातो. हा सगळा परिसर गजबजलेला आणि अरुंद असल्याने दिवसाच्या कुठल्याही वेळेला इथे गर्दी असते आणि दुचाकी-तीन चाकी वाहनांच्या गर्दीत चालणे मुश्कीलच असते. मंदिराच्या छट्टाद्वाराच्या बाजूला चित्रा नावाची ऐतिहासिक जुनी इमारत आहे. चित्राच्या समोर मधुबालाची आई राहात होती असे सांगतात. चित्राच्या आवारात कापडाची, पानाची, खाण्या-पिण्याची दुकाने आहेत.
अनेक घरांमध्ये शिवलिंगाची पूजा केली जात असे. ही मंदिरे आणि शिवलिंग गाढली गेल्याचा आरोप कॉरिडोरविरोधक करतात. कॉरिडोरविरोधात आंदोलन झाल्यानंतर मंदिरांची पाडापाडी थांबली. त्यामुळे अनेक मंदिरे उभी आहेत पण, त्यांच्या भोवती सिमेंटचा आणि मातीचा ढीग साठलेला दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजतगाजत या कॉरिडोरच्या कामाचा शुभारंभ केला होता. हा कॉरिडोर पूर्ण झाला की, विश्वनाथ आणि गंगा यांची थेट भेट होईल. हा कॉरिडोर म्हणजे राष्ट्रकार्य असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
कडक उन्हाळ्यात गंगेचे पात्र आकुंचन पावले असले तरी होडीतून भक्तांची सैर सुरू असते. पैलतीरावर गंगेचे पाणी स्वच्छ असल्याचा समज असल्याने अनेक दक्षिणात्य भक्त पलीकडे स्नान करून पावन होतात. गंगा तुलनेत स्वच्छ झाल्याचे होडीवाल्यांचे म्हणणे आहे. पूर्वी गंगेत कुठेही मृतदेह तरंगताना दिसत असत. आणि आजही मृतदेह गंगेत बुडवणे थांबलेले नाहीत. त्यामुळे मोदींचा नमामि गंगेचा नारा अत्यंत खोटा असल्याचे यावरून सिद्ध होतं आहे.
