नवी दिल्ली: नवनियुक्त लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओके भारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान लष्कप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केले आहे.

पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार असल्याचं नरवणे म्हणाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर करडी नजर ठेवून योग्य ती कारवाई करत पाकचे मनसुबे उधळून लावण्यात भारताला यश येत असल्याचं नरवणे यांनी यावेळी सांगितलं.

जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये दोन निशस्त्र नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याने त्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याबद्दल बोलताना लष्करप्रमुख नरवणे यांनी म्हटले की, आम्ही अशाप्रकारे अमानुष कारवाईचा आधार घेत नाही, सैन्य रुपाने आम्ही अशा घटनांना योग्यप्रकारे हाताळू. सियाचीन बद्दल बोलताना त्यांना सांगितले की, सियाचीन आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, ज्या ठिकाणी एक फॉर्मेशन पश्चिमी आणि उत्तरी मोर्चा सांभाळून आहे. हे धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे आहे, या ठिकाणाहूनच काही होऊ शकते, असे देखील नरवणे यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title:  PoK also should belong to India says Army Chief Naravane.

PoK भारतात आला पाहिजे अशी संसदेची इच्छा असेल तर आम्ही…काय म्हणाले लष्करप्रमुख?