शिरूर : देशात लवकरच येऊ घातलेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व केल्यास मला नक्कीच आनंद होईल. तसेच शरद पवार हेच २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत देशाचे चित्र पालटवू शकतात असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मी काँग्रेसचा नेता असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच माझे नेते असले तरी भविष्यातील राजकारणाचा विचार करता शरद पवारांनी देशातील सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व केल्यास मला नक्कीच आवडेल असं ते म्हणाले. शरद पवार हे जर पंतप्रधान झाले तर मला परमानंदच होईल असं सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांनी मत व्यक्त केलं. पवार साहेब आणि माझा पक्ष वेगळा असला तरी आम्ही एकमेकांवर टीकाटीपण्णी करतो आणि न पटलेल्या मुद्द्यांवर भांडतो सुद्धा, परंतु एकमेकाला कधी पाण्यात बघत नाही आणि वाईट सुद्धा बोलत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, आधीचे पंतप्रधान पंडित नेहरू, मोरारजीभाई देसाई, अटलबिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल आणि अनेक जण पंतप्रधान झाल्यावर स्वतःच काही राजकीय संकेत पाळायचे. त्यांनी कोणत्याही निवडणुकीत फार फार तर २ सभा घेतल्या. परंतु नरेंद्र मोदी हे इतके भित्रे आहेत की, त्यांनी कर्नाटकात तब्बल २३ सभा आणि २० रॅली काढतात, तेव्हा स्वतःला बलवान पंतप्रधान म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींची मात्र कीव येते असं सुद्धा सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
