नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहचले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहोचले. दरम्यान ही बेत तब्बल १ तास चालली ज्यामध्ये राज्यासंबंधित अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधताना म्हणाले की, ‘पंतप्रधानांसोबत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली असून त्यात GST आणि इतर अनेक महत्वाचे विषय होते. मात्र राज्यात CAA अमलात येणार असला तरी त्याला घाबरण्याची अजिबात गरज नसून, हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, ना की कोणाचं नागरिकत्व हिरावून घेणारा कायदा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र 25 वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलंय. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान ठाकरे सरकारला तीन महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेतही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत असं सांगितलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु असलेली बैठक काही वेळापूर्वीच संपली आहे. याशिवाय उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची देखील भेट घेणार आहेत.

 

Web Title: Story No need worry about CAA says Chief Minister Uddhav Thackeray.

सीएए’ला घाबरण्याची गरज नाही: मुख्यमंत्री