नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील अठरा राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशांतील तब्बल ९१ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडणार आहे. त्यात विदर्भातील दहा पैकी सात मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पूर्व तयारी केली आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५,००० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ११,००० सुरक्षा दल सज्ज ठेवण्यात आली आहेत.

गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून ३ हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर-वणी), काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्ष -शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-एनसीपी आघाडी अशी लढत आहे.

काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत. मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी सेना व भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे. भंडाऱ्यात राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी नाकारली असून त्यांच्याऐवजी नाना पंचबुद्धे यांना रिंगणात उतरवले आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ देशभरात ९१ मतदारसंघांत आज मतदान