कोलकत्ता : काल पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यावेळी प्रसार माध्यमांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की अमित शहा म्हणजे परमेश्वर आहेत काय की त्यांच्याविरोधात कोणी प्रदर्शन देखील करू शकत नाहीत.
कालच्या तुफान राड्यादरम्यान १९व्या शतकातील समाज सुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, ते कृत्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी स्वतः उत्तर कोलकत्ता येथील विद्यासागर कॉलेजला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की अमित शहा स्वतःला काय समजतात? ते स्वतःला परमेश्वर समजतात का? त्यांच्या विरुद्ध कोणी प्रदर्शन सुद्धा करायचं नाही का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
