मुंबई : काळाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकाल राष्ट्रवाद आणि धर्म हेच आपल्या देशातील मुख्य आणि महत्वाचे प्रश्न असल्याचं अधोरेखित केलं आहे. त्यामुळे यापुढे सामान्यांशी आणि प्रत्येक घराशी निगडित असणारे महागाई आणि रोजगार सारखे अत्यंत महत्वाचे प्रश्न आता निडणूकीचे विषय राहिले नाहीत हे सत्य आहे. कारण मागील ५ वर्ष महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांनी आणि बेरोजगारांनी स्वतः सरकारला भासगोस मतदान करून, सरकारला आम्ही बेरोजगार आणि महागाईने होरपळून मेलो तरी चालेल, परंतु धर्म आणि राष्ट्रवाद महत्वाचा आहे संदेश दिला आहे. त्यामुळे आता त्याच विषयावर आधारित खाद्य सामान्यांना सरकार देत राहील.
वास्तविक राष्ट्रवाद आणि जन्मताच मिळालेला धर्म हा कधीही आणि कोणीही हिरावून घेत नसतो, तसेच तुम्ही बेरोजगारी किंवा महागाईवर तोंड उघडता याचा अर्थ तुमच्यात राष्ट्रवाद आणि धर्मप्रेम कमी आहे असा अर्थ होत नाही. परंतु दैनंदिन आयुष्य धर्म आणि राष्ट्रवाद याविषयावर जगता येत नाही हेच तरुण विसरले आहेत, आणि त्यांना ते समजू देखील देणार नाही अशी तरतूद जणू सत्ताधार्यांनी समाज माध्यमांवरील खोट्या प्रचारातून करून ठेवली आहे.
धर्म आणि राष्ट्रवादावर झालेले मतदान सत्ताधाऱ्यांना अजून उन्मत्त करणार आहे याची सध्या तरी मतदाराला जाणीव नाही. आज १३ वर्षाचा तरुण जेव्हा समाज माध्यमांवर स्वतःच अकाउंट उघडतो आणि तोच सरकारचा ५ वर्षाचा कालावधी पूर्ण होताच १८ वर्षाचा होतो आणि मतदार म्हणून बाहेर पडतो आणि त्यालाच सत्ताधारी मतदानाची हाक देत राहणार. कारण त्या ५ वर्षात तीच समाज माध्यमं त्या तरुण-तरुणीला भाजपने रंगवलेला भारत देश दाखवणार आणि तो त्यांचा मतदार होत जाणार, हे चिरंतर सुरु राहणार आहे.
देशाने मागील १०-१२ वर्षात तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठी मजल मारली आहे, त्यामुळे देशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब करून दैनंदिन कामं मनुष्यविरहित करता येतील यासाठी गुंतवणूक करत आहेत. मोदींच्या सत्ताकाळात तर सरकारी कंपन्या जवळपास बंद झाल्यात जमा आहेत आणि तो त्यांच्याच हितसंबंधांचा भाग आहे. त्यामुळे अमेरिकेत जसं बेलआउट पॅकेज देऊन मोठे रोजगार देणारे उद्योग वाचवले जातात, तसं मोदी सरकार निश्चित करणार नाहीत. सध्या आर्थिक स्थिती नाजूक असल्याने तो विचार करणे देखील मूर्खपणाचे आहे. त्यामुळे धर्म आणि राष्ट्रवादावर झालेलं मतदान भविष्यकाळात तरुण-तरुणी आणि सामन्यांना रडकुंडीला आणणार यात अजिबात शंका नाही.
