नवी दिल्ली: मेक्सिकोने ३११ भारतीयांना अवैधरित्या देशात प्रवेश आणि वास्तव्य केल्याबद्दल माघारी पाठवलं आहे. मेक्सिकोनं सर्व भारतीयांना दिल्लीला पाठवलं असून शुक्रवारी सकाळी बोइंग ७४७-४०० चार्टर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. मेक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इन्स्टिटूजने याबाबतची माहिती दिली आहे. भारतात परत पाठवलेल्या लोकांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मेक्सिकोनं परत पाठवलेले भारतीय ६० फेडरल मायग्रेशन एजंटच्या मदतीनं तिथं पोहचले होते. चौकशीत त्यांच्याकडे कागदपत्रेही नसल्याचं समोर आलं. वास्तव्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जवळ नसतानाही संबंधित लोक गेल्या काही महिन्यांपासून तिथे होते.

आयएनएमकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘ज्या भारतीयांना परत पाठविण्यात आले आहे. ते ६० फेडरल मायग्रेशन एजन्ट्सच्या माध्यमातून मेक्सिकोत पोहोचले होते. चौकशी केली असता त्यांच्याजवळ आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. आवश्यक असणारी कागदपत्रे नसतानाही गेल्या काही महिन्यांपासून हे सर्व जण त्याठिकाणी राहत होते.’

सुत्रांच्या माहितीनुसार, या सर्व नागरिकांनी २५-३० लाख रुपये एजन्टला दिले होते. या भारतीयांना मेक्सिको बॉर्डवरून अमेरिकेत पाठविण्याचे आणि नोकरी देण्याचे कारण देत एजन्ट्सनी त्यांच्याकडून पैसे घेतले. तसेच, या रक्कमेत विमान प्रवाससह मेक्सिकोत राहण्याची व्यवस्था केली असल्याचे समजते.

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मेक्सिकोने ३११ भारतीयांना माघारी पाठवलं