इस्लामाबाद: काश्मीर प्रकरणावरुन सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सध्या पाकिस्तानात सुरु आहे. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होणार आहे. या बैठकीवर भारताची करडी नजर असणार आहे कारण यामध्ये पाकिस्तानची पुढील रणनीती काय असेल यावर निर्णय होणार आहे. दरम्यान, आज जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. यात एक भारतीय जवान शहीद झाला. गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत पाकिस्तानकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान तोंडघशी पडलं. त्यामुळे हताश झालेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ही महत्वपूर्ण बैठक बोलविली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्दा घेऊन जाण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र चीन सोडून कोणत्याही देशाने पाकिस्तानला समर्थन दिलं नाही. त्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, काल राजनाथ सिंह म्हणाले, आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’ असे राहिले आहे. मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. दरम्यान, राजनाथ यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे. ते म्हणातात, पोखरण ही अशी जागा आहे ज्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच यावेळी त्यांनी ‘नो फर्स्ट युज’ हे तत्त्वही निश्चित केले. भारत या तत्त्वाचे कसोशीने पालन करीत आहे मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

तर दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की जम्मू काश्मीरला दिलेले कलम ३७० मोदी सरकारने हटवल्यानंतर पाकिस्तानला चांगलाचं दणका बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सैरभैर पंतप्रधान इम्रान खान हे भारताशी युद्ध करणार असल्याची धमकी वारंवार देत आहेत. यावरून भारताचे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित