सिंधुदुर्ग : येत्या आठ दिवसात भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. भाजपात प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना कोकणात मी आणली होती, त्यामुळे भाजपात प्रवेश केल्यास कोकणात पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.

सावंतवाडीत राणेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि भाजपात जाण्याबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोबत आहेत आणि राहतील, असंही राणे म्हणाले. भाजप प्रवेश कधी होईल हे आता सांगू शकत नाही, पण येत्या आठ दिवसात तो होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजप-शिवसेना युती होईल की नाही याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. माझं बोलणं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी झालेलं आहे. मला भाजपचे नेते पक्षात प्रवेश देणार आहेत,’ असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाची कल्पना दिली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आठ दिवसात आपला प्रवेश होणार असल्याचं म्हटलं आहे.

‘नाणार रिफायनरीबाबत आजही आपण जनतेच्या सोबत असून या प्रकल्पाला त्यांचा विरोध होता म्हणूनच आम्हीही विरोधात होतो. पण आता लोकांचं म्हणणं काही वेगळं असेल तर लोकांशी चर्चा करूनच आपण तशी पावलं टाकू,’ असा पवित्रा आमदार नितेश राणे यांनी घेतला आहे. नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यानी राजापूरचा सभेत केलेल्या वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी ही सावध प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे आधी नाणारवरून आक्रमक भूमिका घेणार नितेश राणे मवाळ कसे झाले, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

शिवसेना कोकणात मी आणली होती, पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील: खा. नारायण राणे