मुंबई: शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असं आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनीही म्हटले आहे. शिवसेनेने समसमान फॉर्म्युला समोर आणून अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला मान्य होईल असे वाटत नाही त्यापेक्षा शिवसेनेने पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे आणि आदित्य ठाकरेंना त्या पदी बसवावे अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाने अशी ऑफर दिली तर शिवसेना ही ऑफर स्वीकारेल असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब बोलून दाखवली.

रामदास आठवले म्हणाले की, निवडणुकीत जनतेनं महायुतीला कौल दिला असून सत्तास्थापनेसाठी काय निर्णय घेता येईल हे येत्या ३-४ दिवसांत स्पष्ट होईल. तसेच शिवसेनेचा समान जागा वाटपाचा फॅार्म्यूला भारतीय जनता पक्षाला मान्य होईल असं वाटत नाही. त्यामुळे शिवसेनेने ५ वर्षासाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारुन आदित्य ठाकरेंना त्या पदी बसवण्याचा सल्ला शिवसेनेला दिला आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला अशी ऑफर दिल्यास शिवसेना स्वीकारेल असं देखील रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

महायुतीला जनतनेने निवडलं आहे, त्या जनमताचा आदर दोन्ही पक्षांनी करावा आणि शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. आपण याबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत असंही आठवलेंनी म्हटलं आहे. सत्तास्थापनेचं काय करायचं याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसात होईल असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, निकालांनंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सत्तेच्या चढाओढीवरून कुरघोडी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्ष आताही मोठा भाऊ म्हणून समोर आल्यानंतर शिवसेनेला महत्त्वाकांक्षा असलेलं मुख्यमंत्रिपद मिळणं काहीसं अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेनंही आता भारतीय जनता पक्षावर दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हरयाणा आणि महाराष्ट्रातील निकालांची तुलना करत भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरेंसाठी सेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे: रामदास आठवले