मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला काल बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागलं. त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत होते. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होत्या.

त्यानुसार, आज भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले (Maharashtra Assembly Speaker Nana Patole) यांच्या विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सकाळी ११ वाजता याची अधिकृत घोषणा होणार आहे. भारतीय जनता पक्षाने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने राज्यातील विधानसभा निवडणूक बिनविरोध पार पडणार हे निश्चित झालं.

याबाबत माहिती देताना, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) म्हणाले, काल रात्रीपासूनच सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला वारंवार आवाहन केले होते की, विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावे यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा. महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे की अध्यक्षांचे पद हे वादात आणायचे नाही. त्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही आमचे उमेदवार किसन कथोरे (BJP MLA Kisan Kathore) यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे पाटील यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड