सोलापूर: सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील १० लोकसभा मतदारसंघांसाठी मतदार प्रक्रिया सुरु आहे. याच निवडणूक प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्रात कित्तेक ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान नोंदवण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांमध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे.
सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व भाजपाचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर अशी तिहेरी लढत आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच आता सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सोलापूरमधील एका मतदान केंद्रावर ई.व्ही.एम. मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी कमळालाच म्हणजे (भाजपाला) मत जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ई.व्ही.एम. सील करुन नवीन यंत्र दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले सोलापूरमधील एका मतदान केंद्रावर वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी भाजपालाच मत जात आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील अशी घटना घडल्याचे सांगत हा प्रकार लक्षात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मशीन सील करुन नवीन यंत्र पाठवल्याचे स्पष्ट केले.
परंतु सोलापूरमधील जिल्हाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांचे आरोप निराधार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
