मुंबई: अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. बारामाही पिकांमध्ये फळबागांसह विविध पिकांचा समावेश होतो. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जे काही पीक आलं होतं, ते सर्व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे. त्यांतच त्यांना तातडीच्या मदतीची गरज होती. दरम्यान, आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्यपालांनी मदत जाहीर केली आहे. २ हेक्टरपर्यंक शेती असलेल्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. खरीपासाठी प्रति हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी १८ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

राज्यपालांनी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली खरीप पिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. तर हेक्टरी ८ हजार रुपये मदत म्हणजे प्रती गुंठा ८० रुपये इतकी मदत खूप कमी असल्याचे पाटील म्हणाले.

तसेच राज्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जाहीर केलेली मदत नुकसानीच्या मनाने अत्यंत कमी आहे. राज्यपाल यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून प्रति हेक्टरी खरीप पिकांसाठी कमीत-कमी २५ हजार रुपये तर फळबागांसाठी ५० हजार रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी सुद्धा यावेळी जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी केली.

तत्पूर्वी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राज्यपालांनी केलेली मदत तुटपुंजी असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Former MP Raju Shetti) यांनी राज्यपालांच्या या मदतीवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ८० रुपये मदतीच्या निर्णयाचा राज्यपालांनी फेरविचार करावा: जयंत पाटील