मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण १४ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. दुपारी उन्हाचा ताप टाळण्यासाठी सकाळी-सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याने ताटकळत रांगेत उभे रहावे लागले. यामुळे अनेकजण मतदान न करताच घरी निघून गेले गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, जालन्यातील टाकळी अंबड येथे तब्बल दीड तासापासून मतदान यंत्र बंद पडले आहे. औरंगाबाद येथील बुथ क्रमांक २११, २१० आणि १६१ वर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर अमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर वीस मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले.

माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक १५८,१६० वरील मशीन बंद होते. याच मतदारसंघातील सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर १ येथील मतदान केंद्र १४० मधील मशीन एक तास झाले बंद पडले होते. यामुळे मतदार खोळंबून निघून गेले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्र १५५ मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. तर भीमनगर येथे मतदान केल्यानंतर मशीनचे बटन दाबले जात नव्हते त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती.

औरंगाबादमधील मतदान केंद्र क्रं.२२२, २१९ वरील मशीन तासभर सुरू न झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. डोकेवाडी ( तालुका श्रीगोंदा ) मतदान केंद्रावर अर्धा तास उशीरा मतदान सुरू. ईव्हीएम बंद पडले होते. तर कोल्हापूरमध्ये सात ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरूच झालेल्या नसल्याने मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सातारातील जवळवाडी ( मेढा) येथे मतदान मशिन नादुरूस्तीमुळे ४५ मिनिटे उशिराने मतदानाला सुरूवात झाली. चोपडा तालुक्यात दोन केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडामुळे उशिराने मतदान सुरू झाले.

जालन्यातील टाकळी अंबड येथे दीड तासापासून मतदान यंत्र बंद, मतदार निघून गेले