औरंगाबाद : ‘औरंगाबाद’ की ‘संभाजीनगर’ या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उडी घेणार आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील शहराच्या नामांतराची मागणी विधानसभेत करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी राजू पाटील आणि अभिजित पानसे औरंगाबाद शहरात कालच दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

आमदार पाटील म्हणाले की, शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यातही होता. मात्र असे असताना सुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे पाटील म्हणाले.

तत्पूर्वी १ जुलै २०१९ मध्ये काही शिवसैनिकांनी औरंगाबाद या नावावर ‘संभाजीनगर’ अशी पाटी लावल्याने रेल्वे स्थानक परिसरात तणाव निर्माण झाला होता. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर २ वरील पाटीवर पिवळा रंग टाकून त्यावर संभाजीनगर अशी पाटी लावण्यात आली होती. ही पाटी लावणाऱ्याने आपण शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं होतं. रेल्वे स्थानकावरील हा प्रकार लक्षात येताच एमआयएमचे काही कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर पोहचले होते आणि त्यांनी ही बाब रेल्वे पोलिसांना सांगितली होती. या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. त्यानंतर एमआयएमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संभाजीनगर नावाची पाटी तात्काळ हटवली होती. तसंच कायदेशीर कारवाई करू, असं आश्वासन दिलं होतं.

 

Web Title: MNS MLA Raju Patil demands renaming Auranagabad as Sambhaji Nagar after Shivsena.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी विधानसभेत करणार: आ. राजू पाटील