२०१९ लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा कौर यांनी घवघवीत यश मिळवलं. राष्ट्रवादीला केवळ सातारा, बारामती, रायगड आणि शिरुर या चारच जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेल्या पाठिंब्याने युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा कौर ह्या खासदार म्हणून निवडून आल्या.
नवनीत राणा कौर यांचे पती आमदार रवी राणा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. तसेच आमदार रवी राणा यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा कौर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली असून हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मानला जात आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देखिल नवनीत राणा कौर यांनी आपला मतदारांशी असलेला संपर्क कायम ठेवला. खासदार नसतानाही त्यांनी लोकोपयोगी कामे चालूच ठेवली. मागील ५ वर्षात त्यांनी १ हजार ७५० गावांना भेट दिल्याची माहिती आहे. तसेच महिलांशी त्यांचा थेट संपर्क मागील ५ वर्षात राहिला आहे.
अमरावती मतदार संघात खासदार नवनीत राणा कौर ह्या महिलांसाठी विशेष आकर्षण आहेत. त्यांचा मागील ५ वर्ष जनतेशी असलेला संवाद आणि महिला विशेष कार्यक्रमातील सक्रिय सहभाग ह्यामुळे अमरावती लोकसभा मतदार संघात वंचित फॅक्टर आणि मोदी फॅक्टरही चालला नाही. शिवसेनेचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्याविषयी मतदारांमध्ये कमालीची नाराजी होती आणि त्याचा फायदा देखील नवनीत राणा कौर यांना मिळाला आणि निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.
