शिरूर : लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये एनसीपीएचे अमोल कोल्हेंनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अमोल कोल्हेंविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी पुण्यामध्ये एनसीपीने शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमबाहेर अमोल कोल्हेंचा भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत.
जुन्नर तालुक्यामधील एनसीपीच्या युवा मंचचे अध्यक्ष अतुल बेनके यांनी हे बॅनर लावले आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन अर्धातास उलटण्याआधीच अमोल कोल्हेंचे अभिनंदन करणारे हे बॅनर झळकले आहेत.
दरम्यान असे असले तरी शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची चांगली पकड असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी देत एनसीपीने मोठी खेळी केली आहे. कारण अमोल कोल्हे यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळणाच्या शक्यता आहे. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील लढत रोमांचक होण्याची शक्यता असल्याची चर्चाचा स्थानिकांमध्ये आहे.
