पिंपरी : शिरूरचे नवनिर्वाचित आणि जाईंट किलर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे एनसीपी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केले. डॉ. अमोल कोल्हे खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याच्या तक्रारींना उत्तर देताना ते आता शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांचा राज्यासाठी विचार सुरू असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष सध्या त्यांना मोठी जवाबदारी सोपविण्याचा गंभीर पणे विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
लोकसभेतून निवडून गेल्यानंतर डॉ. कोल्हे भोसरी मतदारसंघात येत नसल्याच्या तक्रारी पक्षाच्या एंक स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केल्या. त्याचा संदर्भ देत पवार यांनी पिंपळे गुरव येथील बैठकीत त्यांच्या शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगले काम करत आहेत, असे अजित पवार संबंधित कार्यकर्त्यांना म्हणाले.
दरम्यान शेतकऱ्यांचे, बैलगाडय़ांचे प्रश्न त्यांनी मुद्देसूद संसदेत मांडले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक पंतप्रधानांनी देखील केले आहे. आगामी निवडणूक काळात त्यांना शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्याबरोबरीने राज्यभर फिरायचे आहे. त्यामुळे केवळ भोसरी-भोसरी करू नका. ते भोसरी किंवा शिरूरपुरते मर्यादित नाहीत. डॉ. कोल्हे यांना भोसरीत मताधिक्य मिळू शकले नाही. त्यांना २८,००० ची पिछाडी होती. त्यामुळे त्यांना तरी भोसरीत कसे यावेसे वाटेल, अशी सूचक टिप्पणी देखील यावेळी पवारांनी बोलून दाखवली.
