नागपूर: तत्कालीन फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळ नसल्याचा संशय कॅगने अहवालात व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात बेसुमार पैसेवाटप झाल्याचं म्हटलं आहे. दिलेल्या कामांमध्ये नगरविकास खात्याची कामं जास्त होती. त्यासाठी पाहिजे तसं पैशांचं वाटप करण्यात आल्याचं पाटील म्हणाले.
आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मीडियासोबत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ६५ हजार कोटींचा गोंधळ असून आर्थिक घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. आमचे सरकार चौकशी सरकार नाही, पण जे रेकॉर्डला आहे, त्याची आम्ही दखल घेणार आहेत. तसेच, कॅगच्या मुद्द्यांची नोंद घ्यावी लागणार आहे.”
महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी शेवटच्या दिवशी विदर्भातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत चर्चा होईल, अशी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन फडणवीसांना अजित पवार निर्दोष आहेत हे माहित असल्याचाही दावा जयंत पाटील यांनी केला. भारतीय जनता पक्षाने ५ वर्षे खोटे आरोप केले, ते एसीबीनेही सिद्ध केल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.
