पुणे: ‘गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं,’ असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रश्नाचा शरद पवारांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. “गरजी पडली की, पवार साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येऊन साहेबांचे कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की विचारायच साहेबांनी काय केलं?” असे उत्तर देत भारतीय जनता पक्षाचं राजकारण डबल ढोलासारख असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
सोलापूर येथे महाजनादेश यात्रेची सभा झाली होती. या सभेत बोलताना केंद्रीय गृहंमंत्री आणि भाजपाध्यक्ष राष्ट्रीय अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगाव” अशी टीका केली होती. अमित शाह यांच्या टीकेला पवार यांचे नातू रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. “गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येऊन साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत.” असे रोहित पवार म्हणाले.
पुढे रोहित पवार म्हणाले की, नेते पक्षांतर करत आहेत. मात्र पवारांवर निष्ठा असणारे कार्यकर्ते अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर आहेत. स्वतःच्या विकासासाठीचं नेते पक्षांतर करत आहेत. असे असले तरी कार्यकर्ते हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे याच कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष निवडून येईल, असे रोहित पवार म्हणाले. तसेच सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकीपासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमीनच नांगरायची वेळ आलीय, अशी टीका रोहित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केली आहे.
