मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. पवारांच्या या गंभीर आरोपामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. खा. पवार म्हणतात, तत्कालिन राज्य सरकारने सत्तेचा बेसुमार गैरवापर केला. प्रसार माध्यमांमध्ये गैरप्रचार करून जनतेत संभ्रम आणि संशयाचे धुके निर्माण केले. पोलीस तपासाची भिस्त इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर आधारित होती. पोलिसांनी संगणकीय उपकरणांत छेडछाड करणे, पुरावे नष्ट करणे, खोटे पुरावे तयार करणे अशा बेकायदेशीर गोष्टी केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी आवश्यक आहे.

भीमा कोरेगावची दंगल घडविल्याचा आरोप असलेले डॉ. आनंद तेलतुंबडे, पी.वरवरा, सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, गौतम नवलखा, शोमा सेन, रोमा विल्सन, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, बर्मन गोन्साल्विस हे उच्चशिक्षित असून सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात, काहीजण मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, कोरेगाव भीमाप्रकरणी केलेल्या तपासाबाबत गृह खात्यानं पुणे पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीत पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांची उलट तपासणी केली. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत अर्धा तास पोलीस महासंचालक आणि पुण्याच्या सह पोलीस आयुक्तांनी कोरेगाव भीमाप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर तब्बल पावणे दोन तास चाललेल्या बैठकीत गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले.

 

Web Title:  NCP President Sharad Pawar raises a serious question over Bhima Koregaon riot case.

कोरेगाव-भीमा दंगलीमागे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांच्या आरोपाने शिवसेना पेचात