मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन अहिर यांच्याप्रमाणेच चित्रा वाघ यादेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चांना शुक्रवारी उधाण आलं होतं. शेवटी चित्रा वाघ यांनी राजीनामा देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून पक्षाच्या प्राथमिक सभासदत्वाचा देखील राजीनामा देत आहे. महाराष्ट्रातल्या महिलांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचा आवाज बनण्यासाठी मला दिलेल्या सर्व संधींसाठी मी तुमची (शरद पवार) आभारी आहे’, असं चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे देखील भाजपमध्ये येत्या ३० जुलैला प्रवेश करणार आहेत. शुक्रवारी त्यांनी अकोला येथे मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर वैभव पिचड भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
आगामी विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर असताना राष्ट्रवादीला धक्के बसले आहेत. यावर राष्ट्रवादी कशी सावरते तसंच चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
My Resignation ???? @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks @ANI pic.twitter.com/IohS5J5iz6
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 26, 2019
