बीड: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १६५ च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ९० जागांच्या वर आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे परळीतून धनंजय मुंडे १४००० मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. परळीत बहिण भावाची लढाई रंगली आहे.

अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही लढत आहे. हे दोघे बहिण भाऊ असले तरीही ही निवडणूक दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे. परळीतून धनंजय मुंडे यांनी १४००० मतांची आघाडी घेतली आहे. पंकजा मुंडे या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहेत.

मराठवाड्यातील परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वांचं लक्ष वेधत असल्याने या जागेवर दुसऱ्यांदा इतिहास लिहिला जाणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांना वाटत होते. स्वतः राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे मैदानात उतरले असून त्यांचं देखील या मतदारसंघात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांना तगडं आवाहन निर्माण झालं होतं. दोन्ही बाजूने आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील शक्ती पणाला लागली असून, जोरदार प्रचार सुरु असल्याचं पाहायला मिळत होता.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असताना राष्ट्रवादी पक्षातील महिला आघाडी देखील धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यानिमित्त राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील परळीच्या रणांगणात उडी घेतली होती.

त्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवरून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. खणा-नारळाची ओटी भरून आता लेकीची सासरी पाठवणी करा. चार दिवस सणासुदीला माहेरपणाला येऊन गोडधोड खा, माहेरच्या लोकांना आशिर्वाद द्या आणि आता सुखाने सासरी नांदा, आणि माहेरच्यांना पण सुखाने राहु देत हिच या दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा..! अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली होती.

दरम्यान, २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने १२२ जागा तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजप तब्बल ९० जागांवर तर शिवसेना ५५ जागांवर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेवर मतदार खुश नसल्याचं चित्र असून केवळ स्थानिक उमेदवारांच्या संपर्कावरून त्यांनी अनेक ठिकाणी जागा राखल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र यामध्ये शिवसेनेची बार्गेनिंग पावर वाढल्याचं म्हटलं जातं आहे.

खणा-नारळाची ओटी भरून लेकीची सासरी पाठवणी करा; रुपाली चाकणकरांची हाक खरी ठरणार