अकोला : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अकोल्यात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेद घेतली. या पत्रकार परिषेद ते बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव वंचित बहूजन आघाडीने काँग्रेसला दिला आहे. निर्णयासाठी वंचितने ऑगस्ट अखेरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आमचे काँग्रेससोबत जाण्याचे ठरले, तर काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ सोडावी लागेल. राष्ट्रवादी महाआघाडीत असेल, तर आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. वेळ पडल्यास ते कधीही भाजपबरोबर जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत चर्चा करताना राष्ट्रवादीला गृहीत धरले नाही. राष्ट्रवादी नको असल्याचे स्पष्ट करून निर्णय काँग्रेसच्या कोर्टात टाकण्यात आला. पुढील भूमिका ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करू, असेही आंबेडकर म्हणाले. एमआयएम आमच्याच सोबत असून, कोणताही वाद नाही असं देखील म्हणाले.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, वचिंत बहुजन आघाडी आपली भूमिका कॉंग्रेस समोर मांडणार आहे. एनसीपी कधीही भारतीय जनता पक्षासबोत जाऊ शकते. त्यामुळं राष्ट्रवादीसोबत युती शक्य नाही असेही ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषेदेत म्हणाले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमिन (एमआयएम) या दोन्ही पक्षांतील युतीला अलीकडे तडे गेले होते. खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी तातडीने एक गोपनीय पत्र पाठवून युती अभेद्य ठेवली. सोमवारी दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा करणार आहेत. परंतु एमआयएमला समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर एमआयएम वंचितमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
