मुंबई: मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा डोकं वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुणे सारख्या शहरात तर सामान्य माणूस या पावसाला अक्षरशः कंटाळला आहे. अगदी दिवाळीची खरेदी देखील मंदावल्याचे पाहायला मिळाले. दसऱ्याचं सेलिब्रेशन देखील काहीसं सुस्तावलेलंच पाहायला मिळालं. कितीही महागाई वाढलेली असली तरी सामान्य माणूस छोट्या-मोठ्या स्वरूपात का होईना पण दिवाळी साजरी करतोच.

मात्र मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस म्हणत म्हणत हा पाऊस काय परतायचं नावचं घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या दिवाळीचा देखील हा पाऊस बट्याबोळ करणार का अशी चर्चा सामान्य लोकं करत आहेत. दरम्यान, नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पुन्हा फिरून पुन्हा आल्यानं राज्यात दिवाळीचा उत्साह बऱ्याच प्रमाणात मावळल्याचं चित्र आहे. त्यात हवामान खात्याने पाऊस अजून काही दिवस हजेरी लावणार असल्याचे संकेत दिल्याने दिवाळीच्या दिवसांत आकाशकंदिल, दिवे आणि रांगोळी यांचं काय करायचं याची चिंता घरातल्या जाणत्यांना तसेच बच्चे कंपनीला देखील सतावते आहे. बच्चे कंपनी दिवाळीत पाऊस लावण्यास नेहमीच आतुर असते मात्र आता पावसातच दिवाळी साजरी करण्याची वेळ सर्वावर आली असून, आपल्याला सौम्य का होईना पण फटाक्यांचा आनंद लुटता येणार का याचा विचार बच्चे कंपनी देखील करत आहे.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीची चाहूल लागताच वातावरण पालटून जातं आणि एक प्रकारचा उत्साह ओसंडून वाहू लागतो. यंदा मात्र या उत्साहावर विरजण पडले आहे. त्याला कारण बाजारातील आर्थिक मंदी नसून आकाश व्यापून राहिलेला पाऊस आहे. येत्या २८ पर्यंत पाऊस राहील असा अंदाज आहे. त्यामुळं या निरुत्साहात भर पडली आहे. अंगणात सडारांगोळी कशी काढायची? दिवे कसे लावायचे?, असे प्रश्न गृहिणींना पडले आहेत. तर, आकाश कंदिल कसे आणि कुठे टांगायचे, असा प्रश्न घरातील पुरुष मंडळींना पडला आहे. प्लास्टिकबंदीमुळं प्लास्टिकच्या कंदिलांवर मर्यादा आल्यामुळं या चिंतेत भर पडली आहे. सुट्टी असूनही खेळता येत नसल्यामुळं पावसावर नाराज असणारी बच्चे कंपनी फटाक्यांपासून दूर राहावे लागत असल्यानं अधिकच चिडली आहे.

‘दिवाळीत पाऊस’ की ‘पावसात दिवाळी’? कंटाळा आणला या पावसाने!