सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की कोणती नवी समीकरणं तर उदयास येणार नाहीत ना अशी शक्यता निर्माण झाले आहे. कारण काँग्रेसने जरी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला काँग्रेससोबत घेण्याच्या हालचाली जरी सुरु केल्या असतील तरी त्यात विशेष प्रगती झाली नसल्याचं समोर येत आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी थेट राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची अट घातल्याने काँग्रेस पेचात पडली आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस देखील एमआयएम’मुळे ठोस निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत नाही. परिणामी सर्वकाही अधांतरी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे इतर सहकारी पक्ष तिसरीच आघाडी बनवून स्वबळाची भाषा करू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्ष युतीला शह द्यायचा असेल तर वंचितला एकट्याने लढून चालणार नाही. त्या पार्श्वभूमीवर वंचितचे काही नेते चर्चेसाठी तयार आहेत, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. एका खाजगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता आणि त्यांच्या उमेदवारांनी तब्बल ४० लाखांच्या वर मतं घेतली होती. त्यामुळे याचा फायदा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या युतीला शह द्यायचा असेल तर वंचितला एकट्याने लढून चालणार नाही. त्यांना मदत घ्यावी लागेल, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचितचे काही नेते चर्चेसाठी तयार आहेत. भविष्यात एखादे नवीन राजकीय समीकरण होण्याची शक्यता आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

तसेच राजू शेट्टी पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष -शिवसेनेला पराभूत करणे, हा सर्व विरोधी पक्षांचा एककलमी कार्यक्रम आहे. यासाठी महाआघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी यांना घेण्यासाठी आपण आग्रह धरला आहे. हे दोन्ही पक्ष महाआघाडीत येणार नसतील तर स्वाभिमानीही स्वतंत्रणपणे या दोन्ही घटकांना एकत्र करून लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पडद्याआड स्वाभिमानी, वंचित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिसऱ्या आघाडीच्या हालचाली तर सुरु नाहीत ना अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे आणि राजू शेट्टी यांच्या विधानानंतर त्याला अधीकच बळ मिळताना दिसत आहे. तत्पूर्वी राजू शेट्टी आणि स्वाभिमानीच्या इतर नेत्यांनी देखील कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतली होती.

मनसे व वंचित हे पक्ष महाआघाडीत येणार नसतील तर स्वाभिमानी स्वतंत्रणपणे त्यांना एकत्र घेऊन लढेल