पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील सर्वच लहान मोठे पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस-एनसीपीच्या जागावाटपाची अजून बोलणी झाली नसताना इतर लहान सहकारी पक्षांनी त्यांनी किती जागा लढवायच्या ते निश्चित करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखी काँग्रेस आघाडीला फक्त खेळवत बसण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. तुम्ही आम्हाला किती जागा द्याव्यात यापेक्षा आम्हीच काँग्रेसला ४० जागा सोडतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

मात्र असं असलं तरी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सोबतीला जाऊन बसलेले राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना एकूण ४९ जागा लढवणार असल्याचं कालच्या बैठकीत स्पष्ट केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात २ दिवसीय कार्यकारणीची बैठक पार पडली त्यात हा ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रस-एनसीपीने आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि सांगली अशा एकूण २ जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले परंतु या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा सामोरं जावं लागलं आणि त्यात राजू शेट्टींसारख्या दिग्गज नेत्यांना पराभव सहन करावा लागला. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या बोलणीत जास्त वेळ न घालवता विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४९ जागांवर तयारी सुरु केल्याचं वृत्त आहे.

दरम्यान कालच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने दुधाच्या आणि प्लॅस्टिक बंदीचा फेरविचार करावा यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात प्रोत्साहन बंद केल्याने कांद्याचे दर प्रतिक्विंटल ४०० रूपयाने खाली कोसळले आहेत. तेंव्हा केंद्राने ताबडतोब निर्यात अनुदान त्वरित चालू करावे असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राचा कृषी क्षेत्राचा आर्थिक वेग उणे ८ टक्के इतका खालावलेला आहे. शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी विनाअट सरसकट सात बारा कोरा व शेतीचे संपूर्ण वीज बील माफ करून नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे म्हणून शासनाने कर्जमाफी व वीज बील माफी हे दोन्ही निर्णय त्वरित घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत एकूण ४९ जागा लढवणार: राजू शेट्टी