मुंबई: राज्यात जनतेने भारतीय जनता पक्ष -शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं लवकरच सरकार स्थापन होणार आहे, असं सांगतानाच सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केलं.

महायुतीचं सरकार स्थापन करण्याबाबत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेतील चर्चा बंद आहे. दोन्ही पक्षातील नेते प्रसारमाध्यमातून वेगवेगळे दावे करत आहे. भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यास शिवसेना सत्ता स्थापन करेल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

यावेळी महायुतीच्या चर्चेसंदर्भातील चेंडूही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या कोर्टात टोलावला. ”राज्यात महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्या जनादेशाच आदर करून आम्ही सरकार स्थापन करू. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही. आता ते लवकरात लवकर प्रस्ताव देतील अशी अपेक्षा आहे. शिवसेनेसाठी भारतीय जनता पक्षाची दारे २४ तास खुली आहेत. आम्ही शिवसेनेची वाट पाहू,”असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

फडणवीसांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार: चंद्रकांत पाटील