औरंगाबाद : राज्यात शिवसेनेचा जन्मच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच झाला आहे. सत्तेमध्ये सामील असून देखील शिवसेना विरोधकांसारखी वागते अशी टीका आमच्यावर विरोधकांकडून केली जाते. आम्ही सत्तेमध्ये जरूर सामील आहोत, परंतु आम्ही सामन्य माणसाचा आवाज म्हणून सत्तेत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. जर आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आमच्यात आणि आघाडीमध्ये नेमका फरक काय राहिला? असा देखील प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

तशी गरज पडल्यास शेतकऱ्यांना थेट मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा केंद्राला भेट दिली. त्यानंतर त्यांनी नियोजित ठिकाणी एक छोटेखानी भाषण केले. या भाषणात त्यांनी शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. विमा कंपन्यांना देखील त्यांनी सुनावले आहे, समोरच्या माणसाला जी भाषा कळते त्या भाषेत आम्हालाही उत्तर देता येते असा इशाराच यावेळी त्यांनी दिला.

दुष्काळ म्हणजे मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजला आहे. कारण सरकारच्या अनेक योजना इथल्या लोकांपर्यंत पोहचत नाही. शेतकरी जेव्हा अडचणीत तेव्हा त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम कायमच शिवसेनेने केले आहे. शेतकऱ्यांसाठीचे पैसे आम्ही बँकांना दिले आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पैसे का मिळाले नाहीत हा माझा बँकाना सवाल आहे. आम्हाला ज्यांनी खुर्चीवर बसवले त्यांनाच आम्ही वाऱ्यावर सोडणार असू तर आम्हीही काँग्रेससारखेच होऊ, परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही.

शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू: उद्धव ठाकरे