मुंबई: राजकारणात अनेकांनी मोठ्या पक्षासोबत स्वतःची ‘बार्गेनिंग पावर’ वाढविण्यासाठी एखाद पिल्लू सोडलं आहे. त्यात सर्वात आघाडीवरील मोठं नाव म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister for State Ramdas Athawale) म्हणावे लागतील. मागील अनेक वर्षांपासून ‘मी असतो तिकडे सत्ता जाते’ असं एक पिल्लू त्यांनी सोडलं असून, त्याचा पुरेपूर राजकीय फायदा देखील उचलला आहे. राज्यात मोठं मोठे पक्ष १०-२० खासदार असून देखील एखादं मंत्रिपद मिळण्यासाठी झगडत असतात. मात्र याला रामदास आठवले अपवाद ठरले असावेत असंच म्हणावं लागेल.

कारण स्वतःकडे एकही खासदार आणि आमदार नसताना देखील ते मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात. वास्तविक ते जिथे असतात त्यांच्याकडे सत्ता जाते असं काही नसून, ज्यांच्याकडे सत्ता जाते किंवा जाणार असते याची चुणूक लागते तेव्हा, तेच त्याबाजूला भेटीगाठी सुरु करतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, युपीए सरकारमध्ये जेव्हा सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आलं तेव्हा, तेव्हा ते काँग्रेस-राष्ट्रवादीवर प्रचंड नाराज झाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यक्तिगत झालेला अपमान थेट समाजाशी जोडत राजकारण केलं आणि मोदी लाटेची चुणूक लागताच एनडीए’कडे गेले. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली आणि जाहीर पत्रकार परिषद देखील घेतली. पवारांनी देखील त्यातून प्रकाश आंबेडकरांना अप्रत्यक्ष संदेश दिला.

सध्याच्या बहुजन समाजाच्या राजकारणात प्रकाश आंबेडकरांची किंमत वाढली असून रामदास आठवले यांच्या आरपीआय’ची (आठवले गट) (RPI – Republican Party of India) किंमत जवळपास उरलेली नाही. त्यात रामदास आठवले भाजपसोबत असून देखील महाविकासआघाडीचं सरकार राज्यात स्थापन होणार आहे. त्यामुळे आता रामदास आठवले असतात त्यांच्याकडे सत्ता येते ही देखील अंधश्रध्दा ठरली आहे. पुढच्या निवडणुकीत मात्र रामदास आठवले महाविकासआघाडीत (Mahavikasaghadi) दिसल्यास नवल वाटायला नको असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे, जे येणारा काळच ठरवेल.

आठवले असतात त्यांच्याकडे सत्ता ही अंधश्रध्दा; स्वतःच्या बार्गेनिंग पावरचं माध्यम संपुष्टात: सविस्तर