मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अचानक यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीत मनसे पक्ष सामील होणार का, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, ही भेट शिवसेनेच्या पचनी पडली नसल्यासारखी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
दरम्यान दिल्ली हे राजकीय घडामोडींचं केंद्रच आहे. इथे अनेकांच्या भेटीगाठी होतच असतात. कोण कुणाला कशासाठी भेटतं याची डायरी घेऊन आम्ही बसत नाही. ज्याच्या-त्याच्या पक्षाशी संबंधित हा विषय आहे’, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तळमळीने दिली आहे. दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्व होती. या भेटीची तुलना त्यांच्या भेटीशी होऊच शकत नाही, असा टोलाही त्यांनी प्रतिक्रिया देताना लगावला.
त्यामुळे शिवसेना आम्हाला या भेटीबद्दल काहीच गांभीर्य नसल्याचं दाखवत असली तरी त्यांनी यावर अप्रत्यक्ष खोचक प्रतिकिया नोंदवून रागच व्यक्त केला आहे. कारण उद्या मनसे काँग्रेस महाआघाडीत सामील झाली तर मराठी मतांसोबत इतर अल्पसंख्यांक मतं देखील त्यांना मिळतील ज्यामुळे सर्वाधिक नुकसान हे शिवसेनेला होईल यांची त्यांना कल्पना आहे.
